मुंबई : सध्या असलेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन धुळे जिल्ह्यातील कल्पेश आणि प्रियांका देवरे या दाम्पत्याने विवाहावरील खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला अडीच लाख रुपयांची मदत केली आहे. दोन लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकताच सुपूर्द केला. देवरे दाम्पत्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बोरीस (ता. जि. धुळे) येथील प्रगतिशील शेतकरी परशुराम भाईदास देवरे यांचे पुत्र कल्पेश आणि उंभरे (ता. साक्री, जि. धुळे) येथील प्रगतिशील शेतकरी संजय काशिनाथ सोनवणे यांची कन्या प्रियांका यांचा विवाह ठरला होता. त्यावेळी वर-वधू आणि दोन्ही बाजूच्या कुटुंबीयांनी खर्चिक समारंभाचे आयोजन टाळण्यावर सहमती दर्शवली. साधेपणाने विवाह करून वाचवलेला पैसा राज्यातील सध्याच्या दुष्काळ निवारण कार्यासाठी मदत म्हणून देण्याचा निश्चय त्यांनी केला आणि नोंदणी पद्धतीने विवाह केला.
कल्पेश आणि प्रियांकासह त्यांच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात चार जून २०१९ रोजी भेट घेऊन, दोन लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. या वेळी माजी आमदार प्रा. शरद पाटील या कुटुंबीयांसमवेत उपस्थित होते. समाजासमोर घालून दिलेल्या या आदर्शाबद्दल मुख्यमंत्र्यांनी नवदाम्पत्याचे, तसेच देवरे आणि सोनवणे कुटुंबीयांचे अभिनंदन केले आहे.